कॉलेज कट्टा न्यूज अहिल्यानगर-
महापालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 15 मुळे लक्षवेधी ठरू लागली आहे. इथं भाजप शिंदे शिवसेनेत, तथा काका विरुद्ध पुतणीत फाइट रंगली आहे. दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उमेदवार यांच्या घरावर निवडणूक यंत्रणेने हवाला पैसा आल्याच्या संशयावर छापा घातला होता…
दरम्यान आता याच प्रभागात भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हणामारी झाली. यात धारदार शस्त्रांचा वापर झाला. पाच गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे? यावरून जिल्ह्यात रंगलेली ही चर्चा राज्याचा विषय ठरत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला काही तास शिल्लक उरले असतांना मतदारां पर्यंत पोहोचण्यासाठी छुपा प्रचार सुरू असतानाच, यातून राजकीय तणाव निर्माण होऊन रक्तरंजित संघर्ष निर्माण झाला आहे.
प्रभाग 15 मध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत आहे. या प्रभागात पुतणी अन् काकामध्येही आमने- सामने ची लढत आहे. पैशांचे वाटप आणी आत्म स्वाभिमानावरून या काका-पुतणीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हणामारी झाली आहे.
या हाणामारीत, धारदार शस्त्राचा वापर झाला असून यात एका महिलेसह पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती विजय गाडळकर, अभिजित दळवी आणि हिमांशु जाधव हे जखमी असल्याचे समजते. इतर काही कार्यकर्तेही किरकोळ जखमी झाले आहे.
या प्रभागातील शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या घरावर निवडणूक यंत्रणेच्या पथकाने पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह हवाला पैसा आल्याच्या संशयावरून छापा घातला होता. याचा धक्का बसल्याने अनिल शिंदे यांची प्रकृती खालवली. यातून त्यांना रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवून उपचार सुरू आहेत. यानंतर लगेच अनिल शिंदेबरोबर पॅनलमध्ये असलेले उमेदवार आणि भाजपचे उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्या चांगलाच राडा झाला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. दरम्यान, जखमींची भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली. विखे म्हणाले, “भाजप उमेदवार दत्ता गाडळकर यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसंच दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या सुनबाई दिप्ती गांधी यांचे पती सुवेंद्र गांधी यांचे वाहन फोडण्यात आले. पोलिसांना विनंती आहे की, हे आवरा, नाहीतर आम्हाला आमच्यापद्धतीने हाताळावा लागेल.आम्ही कायदा-प्रशासनाला मानतो. त्यांनी निवडणूक शांततेपणे पार पाडावी. सर्व पक्षांना आवाहन आहे की, निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या. काल चार जणांना अटक केली. त्यातील एक जण आष्टीचा गुंड होता. बाहेरून जिल्ह्यातून गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, आम्ही जशास तसं उत्तर देऊ.” असेही त्यांनी स्पष्ट केले.




